बांबू तंत्रज्ञानातील पदविका; शिक्षणाबरोबर स्वयंरोजगाराची संधी

बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रातर्फे दाेन वर्षे कालावधीचा बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असून कमीत कमी दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जातो. यास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता आहे. अल्पमुदतीच्या पुर्ण वेळ दोन वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊन आपण आगळ्या वेगळ्या अशा शिक्षणक्षेत्रात ना केवळ पाऊल टाकू शकतो परंतू हे शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर आपल्या स्वयंरोजगाराची वाट ही प्रशस्त होऊ शकते. या अभ्यासक्रमात जास्तीत जास्त प्रात्यक्षिकावर भर देण्यात आला असून केंद्रातर्फे राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय विद्यार्थ्यांना १५०० रुपये दरमहा या पद्धतीने विद्यावेतन देखील दिले जाते.

या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध बांबूक्षेत्रांना भेटी देण्यासाठी नेले जाते. आत्तापर्यंत बल्लारपूर बांबू डेपो, बांबू उद्यान वडाळी नर्सरी, अमरावती यासारख्या ठिकाणी अभ्यासदौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे तर प्रस्तावित दौऱ्यांमध्ये अगरबत्ती प्रकल्प, बांबू कन्‍स्ट्रक्शन साईट, बांबू केन डेव्हलपमेंट इन्स्टिट्युट आगरतला, संपूर्ण बांबू केंद्र, आय.आय.टी मुंबई, यासारख्या ठिकाणी भेटी प्रस्तावित आहेत.

प्रमाणपत्र अभ्यासक्रम-
• सर्टिफिकेट कोर्स इन बांबू कन्स्ट्रक्शन
• सर्टिफिकेट कोर्स इन बांबू मॅनेजमेंट (प्लान्टेशन टु हार्वेस्टिंग) फॉर फार्मर्स
• सर्टिफिकेट कोर्स इन बांबू ट्रीटमेंट

हे अभ्यासक्रम देखील चालवले जातात.

सामंजस्य करार

विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यातील जंगलात विपूल प्रमाणात बांबू आढळून येतो. या जिल्ह्यात प्रामुख्याने ‘डेन्ड्रो कॅलामस स्ट्रिक्टस’ या बांबूंची प्रजाती आढळून येते. बांबूचा प्रत्येक भाग उपयुक्त सिद्ध होतो ग्रामीण जीवनात तसेच व्यावसायिकदृष्टीने उद्योगात बांबूला महत्त्वाचे स्थान आहे. शास्त्रोक्त पद्धतीने बांबू लागवड आणि त्याच्या औद्योगिक वापराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथे बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे.

बांबू उद्योगाला राज्यात चालना मिळण्यासाठी व बांबू वस्तुंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी टाटा ट्रस्ट आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. बांबू कारागिर बांबूचे मूल्यवर्धन करतात, त्यातून रोजगार निर्मिती होते. पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराला चालना मिळण्याची, येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या शैक्षणिक स्तरावरून मार्गदर्शन होण्याची गरज लक्षात घेऊन आय.आय.टी मुंबई आणि बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली यांच्यादेखील सांमजस्य करार करण्यात आला आहे. यासंबधीची अधिक माहिती घ्यायची असेल तर ती www.brtc.org.in या केंद्राच्या संकेतस्थळावरून उपलब्ध होऊ शकेल.

-डॉ. सुरेखा मुळे (‘महान्यूज’)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page