महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न पूर्ण करीत आहेत – केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा

महाराष्ट्रात महानेट कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कार्य

नवी दिल्ली:- महानेटच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण क्षेत्रासह शासकीय कार्यालयांना ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडण्याचे कार्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न ते पूर्ण करीत आहेत, असे गौरवोद्गार काल केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी लोकसभेत काढले.

लोकसभेत आज नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिक जिल्ह्यातील ब्रॉडबँड सेवेच्या अंमलबजावणीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्री. सिन्हा बोलत होते. श्री.सिन्हा म्हणाले, गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केंद्रीय दूरसंचार मंत्रालयात आले होते त्यांनी यावेळी केंद्र शासनाच्या ‘भारतनेट’ प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात ‘महानेट’ ही मोठी योजना तयार केल्याचे सांगितले. अत्यंत आधुनिक सुविधांचा समावेश असलेल्या महानेट योजनेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात टेली मेडीसीन सुविधा देण्यात येत आहे. राज्यातील विविध शैक्षण‍िक संस्थांना या योजनेंतर्गत ब्रॉडबँडने जोडण्यात आले आहे तसेच विविध शासकीय कार्यालयांनाही ब्रॉडबँडच्या माध्यमातून जोडण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानेट कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम कार्य केले आहे, मुख्यमंत्री डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करीत असल्याचे श्री.सिन्हा यावेळी म्हणाले.

दरम्यान, नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण ६११ ग्रामपंचायती असून यापैकी ६०७ ग्रामपंचायती भारतनेटच्या पहिल्या टप्प्यात ब्रॉडबँड सेवेने जोडण्यात आल्याचे श्री. सिन्हा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page