सर्वांगीण विकासासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार महत्त्वाचे – मुख्यमंत्री
‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ ग्रंथाचे प्रकाशन
मुंबई:- महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांनी संपादित केलेल्या ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज यांच्या भाषणांचे संकलन होऊन त्याचे पुस्तक प्रकाशित होणे ही बाब अत्यंत आनंदाची आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला आधुनिक भारताची मुहूर्तमेढ कोल्हापूर येथील संस्थानात रोवण्यात आली. छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, आर्थिक पातळीवर विकासाचा ध्यास घेत असताना समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय दिला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत ही भूमिका मांडून प्रत्यक्षात आणली. कोल्हापूर येथे विमानतळ बांधणे असो किंवा मग कोल्हापूरला रेल्वे आणणे असो यावरुन राज्याची औद्योगिक प्रगतीही महत्त्वाची असल्याचे त्यांनी ओळखले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक आणि आर्थिक न्याय काय असतो हे समजावून सांगितले. छत्रपती शाहू महाराज यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी हेच विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजविण्याचे काम केले. छत्रपती राजाराम महाराज यांनी प्रजेचे सुख हेच आपले अंतिम कर्तव्य मानले. त्यातून त्यांचे समाजाच्या उन्नतीसाठी असलेले विचार दिसून येतात. छत्रपती राजाराम महाराज यांची जनतेसाठी असलेली तळमळ नेमकी काय होती हेच आपल्याला या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या भाषणातून समजते. छत्रपती राजाराम महाराज यांनी २५ व्या वर्षी कारभार हातात घेतला आणि जवळपास १८ वर्षे कारभार केला. पण याच काळात त्यांनी शैक्षणिक क्षेत्र, सहकार, उद्योग, शेती , महिलांचे आरोग्य या क्षेत्रात काळाच्या पुढे जाऊन काम केले. शेतीसंदर्भातील वेगवेगळे प्रयोग, शाश्वत सिंचन पद्धत, जलयुक्त शिवार याचा त्यांनी जवळपास १०० हून अधिक वर्षांपूर्वी विचार केला यावरुन त्यांची दूरदृष्टी दिसून येते.
छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची उंची कमी करण्यात आलेली नाही
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला स्वाभिमान दिला आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावेसे वाटते की, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तयार करण्यात येत असून या स्मारकाची उंची कमी करण्यात आलेली नाही. हे स्मारक तयार करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व परवाने राज्य शासनाने यापूर्वीच मिळविले आहेत.
आरक्षणाबाबतची भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी प्रथमत: मांडली
समाजामध्ये राहत असलेल्या सर्व घटकांपर्यंत सुविधा पोहोचणे आवश्यक आहे. मागासांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे. सामाजिक दरी मिटविण्यासाठी आरक्षण आवश्यक असल्याची भूमिका प्रथमत: छत्रपती शाहू महाराजांनी मांडली.
मुख्यमंत्री म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच त्यांचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी राज्यकारभार केला. छत्रपती राजाराम महाराजांच्या या प्रेरणादायी कामाची महती आजच्या युगात आपणाला अनुभवायची असेल तर छत्रपती राजाराम महाराजांच्या काळातील कागदपत्रे महत्त्वाची ठरतात. महत्त्वाची कागदपत्रे, निवडक भाषणे हे सर्व ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या प्रकाशनातून प्रकाशित करण्यात येत असल्याचा आनंद आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यावेळी म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज यांचे पुरोगामी आणि दूरदृष्टी असलेले विचार हे आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून होणार आहे. ४६ भाषणांचा संग्रह असलेल्या या पुस्तकातून आजच्या पिढीला छत्रपती राजाराम महाराज यांनी सामाजिक समता महाराष्ट्रात निर्माण करण्यासाठी केलेले काम समजण्यास मदत होणार आहे.
पुराभिलेख संचालनालयात सन १६३० पासूनचे दुर्मिळ अभिलेख जतन करण्यात आले असून यामध्ये मराठी, मोडी, इंग्रजी, पर्शियन आणि उर्दू अभिलेखांचा समावेश आहे. पुराभिलेख संचालनालयामार्फत इस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिशकालीन राजकीय तसेच स्वातंत्र्य चळवळ, पेशवेकालीन अभिलेख, साताऱ्याचे छत्रपती, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीसंबंधातील अभिलेख, निजामकालीन कागदपत्रे, नागपूरकर भोसले यांची कागदपत्रे असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा अभिलेख जतन करण्यात आला आहे.
यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार राम कदम, समरजितसिंह घाटगे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे आदी उपस्थित होते. (‘महान्यूज’)