रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानीत्यांचा सत्कार
सोनम वांगचुक, डॉ. भरत वाटवानी यांनी महाराष्ट्राचे सदिच्छादूत म्हणून काम करावे – विनोद तावडे
मुंबई:- शिक्षण क्षेत्रात काळा-bनुरुप बदल होत आहे. पण येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्राला पुढे नेताना सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानी यांच्यासारख्यांची महाराष्ट्राला गरज आहे. समाजातील प्रत्येकाचा भावनिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्राचे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बॅसेडर) म्हणून काम करावे. जेणेकरुन अनेकांना प्रेरणा मिळेल, असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.
रॅमन मॅगसेसे पुरस्कार-२०१८ चे विजेते शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांचा सन्मान सोहळा सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला. आशियातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा २०१८ साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार यंदा दोन भारतीयांना जाहीर झाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांचा सत्कार कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विविध विद्यापीठांचे कुलगुरु आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, दोन्ही पुरस्कार विजेत्यांनी स्वत:शी संवाद साधून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. मातीशी नाळ जुळणारे शिक्षण असेल, तर विद्यार्थी त्या शिक्षणामध्ये अधिक रस घेतात हे दिसून आले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना नेमके काय आवडते आहे हे जाणून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सोनम वांगचुक यांनी लडाखसारख्या दुर्गम भागात काम करताना केला. तर डॉ. भरत वाटवानी यांनी आपण समाजाचे देणे लागत असल्याने समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून मानसिक रुग्णांना आश्रय दिला. आज भारत तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीयांमध्ये असलेले भावनिक बुद्ध्यांक चांगले मानव संसाधन निर्माण करु शकते आणि हेच मानव संसाधन भारताला विविध क्षेत्रात येणाऱ्या काळात आघाडीवर ठेवेल.
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य वाढणे आवश्यक आहे. पण हे करीत असताना विद्यार्थ्यांचा नुसता बुद्ध्यांक वाढून उपयोग नाही तर भावनिक बुद्ध्यांक वाढणेही तितकेच आवश्यक आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत भावनिक बुद्ध्यांकाची सांगड घालणे म्हणूनच आवश्यक बनले असल्याचेही श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
सोनम वांगचुक म्हणाले की, शिक्षणात सुधारणा होणे ही काळाची गरज आहे. मुलांना देण्यात येणारे शिक्षण भौगोलिक स्थिती यावर बरेचसे अवलंबून असते. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी सांघिक प्रयत्न करताना मातृभाषेतून मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी आपण आग्रही असणे आवश्यक आहे. गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना बदलत्या शिक्षणपद्धतीप्रमाणे बदल केल्याचेही वांगचुक यांनी यावेळी सांगितले.
डॉ. भरत वाटवानी यावेळी म्हणाले की, सुरुवातीला वेगळे काम करीत असल्याने त्रास झाला. पण समाजात राहणाऱ्या एका व्यक्तीला तरी आपण बरे करु शकलो पाहिजे या विश्वासाने काम सुरु केले. आज वेगवेगळे आजार अनेकांना होतात पण अजूनही आपण मानसिक आजाराचे रुग्ण आहोत हे आपण पटकन मानायला तयार होत नाही त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मानसिक आजाराबाबत धडे देणे, विद्यार्थ्यांना या आजाराबाबत पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांविषयी…
सोनम वांगचुक
सोनम वांगचुक यांनी लडाखमधल्या दुर्गम भागात काम केले आहे. निसर्ग, संस्कृती, विज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनम वांगचुक यांनी लडाखच्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले, पाणीटंचाईवर मात करणारे आईस स्टुपा बनवले, लाखो लोकांना/मुलांना प्रयोग करण्याची प्रेरणा दिली आहे. सोनम वांगचुक यांनी १९८८ साली इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी लडाखमधील बहुतांश विद्यार्थी सरकारी परीक्षांमध्ये नापास व्हायचे. १९९४ साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी आतापर्यंत ७०० शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, लडाखमध्ये दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण अत्यल्प होते तेच आता जवळपास ८० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
डॉ. भरत वाटवानी
भरत वाटवानी यांनी कफल्लक होऊन रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यावर मोफत उपचार केले व त्यांच्या कुटुंबियांशी त्यांची भेट घडवून आणली. डॉ. भारत वाटवानी आणि त्यांच्या पत्नी कफल्लक झालेल्या रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या खासगी क्लिनिकमध्ये घेऊन यायचे. त्यांच्यावर मोफत उपचार करायचे. डॉ. वाटवानी यांनी अशा रुग्णांना मोफत अन्न पाणी आणि आश्रय दिला. त्यांच्या मनोविकारावर उपचार करुन त्यांच्या कुटुंबियांशी त्यांची भेट घडवून आणली. भरत वाटवानी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे.