संपादकीय- बॉम्ब बनविणारी विकृती घातकच; ती ठेचायलाच पाहिजे!
आज पहाटे नालासोपाऱ्यात वैभव राऊतला अटक करण्यात आली. अनेक बॉम्ब आणि बॉम्ब बनविण्यासाठीचे लागणारे साहित्यासह तो एटीएसच्या (Anti-Terrorism Squad दहशतवाद विरोधी पथक) जाळ्यात सापडला. त्याचे धागेदोरे खूप दूरपर्यंत पोहचले असल्याचे प्राथमिक तपासावरून समजते. त्यामुळे लवकरच ह्या प्रकरणावर पुरेसा प्रकाश पडेल; परंतु बॉम्ब बनविणारी विकृती देशाच्या अंतर्गत सुरक्षेला छेद देणारी आहेच. ह्या विकृतीचा नाश करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत!
`बॉम्ब’ हा काही रोषणाई करण्यासाठी नसतो, फटाके फोडण्यासारखा त्याचा वापर करायचा नसतो. तर माणसांना ठार मारणे, त्यांना गंभीर जखमी करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, समाजामध्ये दहशत पसरविणे हाच क्रूर उद्देश असतो. त्यामुळे बॉम्ब बनविणारा कुठल्याही जातीचा-धर्माचा नसतो. तो असलाच तर जात्यांध्य-धर्मांध असेल; जो समाज विधायक कार्य करीत नाही, समाज विघातक कारवाया करतो. म्हणून अशा गंभीर गुन्ह्यांचा तपासही अतिशय पारदर्शकपणेच व्हायला पाहिजे. मागील काही तपासामध्ये अधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका न्यायालयात उघड झालेली आहे. त्यामुळे गंभीर आरोपी एकतर निर्दोष सुटतात किंवा निर्दोष व्यक्ती आयुष्यभर खोट्या गुन्ह्याखाली तुरुंगात सडते.
दहशतवादी मिळाला की, आमच्या देशात त्याचा पहिल्यांदा धर्म तपासाला जातो; कारण इथल्या तथाकथित राजकारण्यांना, धर्मांध संघटनांना-लोकांना देशवासियांमध्ये धर्माच्या नावावर संभ्रमित करायचे असते. आजपर्यंत हेच होत आले आहे आणि पुढेही होत राहणार आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असते की, धर्माच्या नावावर स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजणाऱ्यांना दूर ठेवणे.
नागरिकांनी जबाबदारीने वागावे असे राजकारण्यांना सदैव वाटते; परंतु राजकारण्यांनी आपल्या नेत्यांना धर्मांध वागू नये असा सल्ला द्यायचा असतो व धर्मांध कृती-धर्मांध मत रोखायला पाहिजे. तरच खऱ्याखुऱ्या धर्मांधांना वठणीवर आणता येईल. एवढेच नाहीतर बॉम्ब बनविणारी विकृती रोखणे सोपे जाईल.