देशाला संपन्न करणारे उपक्रम राबविण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मुंबई:- अनेक मोठे उद्योजक सामाजिक जाणिवेतून कार्य करीत आहेत, या कार्याबरोबरच देशाला संपन्न करणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. लायन्स क्लब ऑफ मुंबई सोल या संस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या २६ व्या गोल्ड अॅवार्ड कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यपाल पुढे म्हणाले, लायन्स क्लब सारख्या संस्था सामाजिक कार्यात सातत्याने आपले योगदान देत आहेत. देशासाठी शहीद झालेल्या कुटुंबांसाठी देखील उल्लेखनीय कार्य लायन्सच्या माध्यमातून होत आहे. सैनिकांसाठी एक रॅंक एक पेंशन सुरु करण्यासाठी आपले योगदान देता आले आणि त्यामुळे देशातील कोणत्याही भागात गेल्या नंतर जवानांकडून आजही सातत्याने प्रेम मिळत असल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.
आपल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल विवीध क्षेत्रातील मान्यवरांना गेल्या २६ वर्षांपासून पुरस्कृत केले जात आहे, राज्यपालांनी या वर्षी पुरस्कार प्राप्त सन्मानार्थींचे अभिनंदन केले.
यावेळी सैन्यातील शहीद झालेल्या पाच जवानांच्या वीर पत्नींचा सत्कार राज्यपालांच्या हस्ते करण्यात आला. दिवंगत लायन लेफ्ट. कर्नल. डॉ. अशोक चोप्रा यांच्या नावाने हा सन्मान दिला जातो. एक लाख रुपयांचा धनादेश, मेडल, सर्टीफीकेट, आणि सन्मानचिन्ह असे याचे स्वरूप आहे. त्याचप्रमाणे या कुटुंबियांना दत्तक घेऊन त्यांच्या मुलांचे शिक्षण व लग्न याचाही खर्च उचलला जातो. लायन्स क्लब ऑफ मुंबई सोल या संस्थेच्या सदिच्छादूत प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा या आहेत.
या कार्यक्रमाला लायन राजू मनवानी, अलोक हरलका, अजय अरोरा, श्रीमती सिता राठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.