चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी नोकरीसाठी ग्रामपंचायतीत अर्ज करा!
सिंधुदुर्ग:- चिपी विमानतळासाठी चिपी व परुळे ग्रामपंचायत हद्दीत जमिनींचे भूसंपादन झाले आहे. या दोन्ही गावातील ज्या कुटुंबांच्या जमिनींचे भूसंपादन झाले आहे अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील इच्छुक व्यक्तींनी नोकरी मिळण्याबाबतचे अर्ज आपल्या शैक्षणिक अर्हतेसह व सोबत जमिनीचा ७/१२ उतारा जोडून संबंधित ग्रामपंचायतींमध्ये द्यावेत. पात्र व्यक्तींना नोकरी देण्याबाबत आय.आर.बी. कंपनीमार्फत कार्यवाही केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित चिपी विमानतळ कामाच्या आढावा बैठकीत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज आय. आर. बी. कंपनीचे वरीष्ठ आधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, लघुपाटबंधारे विभाग, वीज वितरण कंपनी आदी अधिकाऱ्यांच्या बरोबर आयोजित बैठकीत विमानतळ कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षितकुमार गेडाम, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच.टी. जगताप उपस्थित होते.
चिपी विमानतळासाठी तात्पुरता पाणी पुरवठा सुरु करण्यासाठी पाट तलावापासून लाईन टाकण्याचे संयुक्त सर्वेक्षण करावे, सार्वजनिक बांधकाम विभागाने चिपी गावाकडे जाणारा रस्ता, परुळे गावातून विमानतळाकडे येणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम आठ दिवसात सुरु करावे. परुळे गाव ते विमानतळ बी.एस.एन.एल. केबल टाकण्याचे काम त्वरीत पूर्ण करावे. वीज कंपनीने कायमस्वरुपी वीज पुरवठा व्हावा या दृष्टीकोनातून आय.आर.बी. कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन कार्यवाही सुरु करावी आदी सूचना या बैठकीत पालकमंत्री श्री.केसरकर यांनी केल्या.