मनःसामर्थ्यदाता एकाच वेळी दृष्टीपातही करतो, भक्तही बनवतो आणि पापरहितही करतो!
स्वयंभगवान त्रिविक्रमाची अठरा वचने- लेखांक पाचवा
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
माझिया एका दृष्टिपातात। भक्त होईल पापरहित॥
पाचव्या वचनात त्रिविक्रम ग्वाही देतात “माझ्या एका दृष्टीपातात भक्त पापापासून मुक्त होईल.”
आम्ही श्रीहरिगुरुग्रामला जातो; आम्हाला वाटते परमपूज्य बापूंनी आमच्याकडे पहावे. जर पाहिले नाही तर दुःख होते. यात चूक काहीच नाही. पण हे लक्षात ठेवायला हवे की मी दर्शन घ्यायला आलो आहे द्यायला नाही.
त्रिविक्रम अनिरुद्धांनी माझ्याकडे पाहिले नाही याचा अर्थ मी पापमुक्त होणार नाही का?
दर्शनात्स्पर्शनाच्छब्दात्कृपया शिष्यदेहके
(सद्गुरुंच्या कृपायुक्त दृष्टिकटाक्षाद्वारे, स्पर्शाने, प्रेमपूर्ण शब्दांनी भक्तावर कृपा घडून येते.)
सद्गुरूंचा दृष्टिक्षेप, सद्गुरुंचे नाम, सद्गुरुंचा शब्द, सद्गुरूंचे दर्शन, सद्गुरूंचा कृपास्पर्श, अगदी सद्गुरूंना स्पर्श करून येणारी वार्याची झुळूकही आम्हाला पापरहित करू शकते. कारण या सगळ्यामागे सद्गुरुंचा आम्हाला पापमुक्त करण्याचा संकल्प असतो आणि आम्हाला माहीतच आहे ” राम सत्यसंकल्प प्रभू”.
ह्याच्या दृष्टीपाताने भक्त पापरहित होणारच! पण भक्त होणे सोपे आहे का ? फक्त भक्त व्हायची तीव्र इच्छा हवी आणि प्रामाणिक प्रयत्न हवेत; मग तोच आम्हाला भक्ती शिकवतो आणि भक्त करून घेतो. त्या लीलेचा आनंद केवळ अनुपमेय !
आम्ही सामान्य संसारी भक्त. आमच्या हातून सतत पापे घडतात.
पुण्याकडे लक्ष जाय। पापाकडे ओढिती पाय। सत्कर्माचा शोधितां ठाय। कुकर्मीं काय आतुडे ॥१३/३०॥
मग ही पापे करण्याची इच्छाच होऊ नये हे कसे होणार ?
इथेही त्या सद्गुरु त्रिविक्रमाची दृष्टीच काम करते. हेमाडपंत सांगतात-
आपण कांहींही कुठेंही करितां । येई न साईंची द्दष्टी चुकवितां । येविषयीं जाहली निश्चितता । असत्कार्यार्थता विराली ॥२१/१२१॥
मनःसामर्थ्यदाता त्रिविक्रम एकाच वेळी तीन पावले टाकतो – दृष्टीपातही करतो , भक्तही बनवतो आणि पापरहितही करतो.
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
(क्रमश:)
– डाॅ आनंदसिंह बर्वे