नाथसंविध् माहात्म्य… जन्मजन्मांतरासाठी निर्भय होण्याचा सर्वोत्तम मार्ग!
।। हरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।।
।। नाथसंविध् ।।
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी श्रद्धावानांसाठी जीवन सर्वांगीण सुंदर करणारे अनेक खजिने उघडे केले आहेत. त्यातील एक खजिना म्हणजे ‘नाथसंविध्’ रुपी दिलेला खजिना. ह्या खजिन्याचा वापर करून जीवन यशोमय आणि मंगलमय करू शकतो.
‘नाथसंविध्’ समजून घेताना प्रथम ‘नाथ’ कोणाला म्हणतात? हे पाहू.
१) दत्तगुरु म्हणजे निर्गुण अर्थात निरंजननाथ.
२) सदाशिव महादुर्गेश्वर म्हणजे आदिनाथ अर्थात सगुणनाथ. आणि
३) जगदंबा दुर्गा म्हणजे उदयनाथ अर्थात सकलनाथ.
ह्या तिघानांच ‘नाथ’ अर्थात परमेश्वर असे म्हटले आहे.
१) ‘नाथसंविध्’ म्हणजे काय?
‘नाथसंविध्’ हे त्रिविक्रमाचे नाम आहे.
‘नाथसंविध्’ म्हणजे प्रत्येक मानवाच्या उत्कर्षाचा आराखडा आहे.
‘नाथसंविध्’ ही परमेश्वराची सर्वश्रेष्ठ प्रार्थना आहे.
‘नाथसंविध्’ हा श्रद्धावानाच्या जीवनातील प्रत्येक घटनेत श्रद्धावानांना भक्कम आधार देणारा आधारस्तंभ आहे.
‘नाथसंविध्’ म्हणजे जगदंबा दुर्गेने पूर्वीच्या जन्मापेक्षा वेगळी अशी तयार केलेली नवीन जन्मासाठीची विशेष योजना आहे.
‘नाथसंविध्’ अर्थात ही जन्मयोजना म्हणजे
वरील तीन नाथांची इच्छा,
तिघांची करुणा,
तिघांचं प्रेम,
तिघांची क्षमा आणि
तिघांच्या सामर्थ्याचा प्रवाह आहे आणि
हा प्रवाह आणणारा भगवान त्रिविक्रम आहे.
त्याचं नावही ‘नाथसंविध्’ आहे.
मानवाने ह्याच आराखड्यानुसार चालावे म्हणून तो एकच एक असलेला भगवान त्रिविक्रम मानवाची श्रद्धा बळकट होण्यासाठी तसेच मानवांच्या सद्गुणांचा विकास होण्यासाठी सतत कार्य करीत असतो.
मात्र हा आराखडा मानवाच्या कर्मस्वातंत्र्याच्या आड येऊ दिला जात नाही. मानव हा आराखडा स्वीकारण्यास किंवा नाकारण्यास त्याच्या कर्मस्वातंत्र्यामुळे स्वतंत्र असतो. परंतु ‘नाथसंविध्’ आराखडा मानवासाठी सर्वार्थाने श्रेयस्कर असतो; परंतु मानव आपल्यासाठी श्रेयस्कर (श्रेय) काय आहे? ह्याचा विचार न करता आपल्याला काय आवडते? ह्याच्या मागे लागतो व ‘नाथसंविध्’ आराखड्यातून बाहेर पडू बघतो.
२) ‘नाथसंविध्’ कसे स्वीकारायचे?
‘नाथसंविध्’ शब्द उच्चारणे म्हणजेच परमेश्वराची इच्छा व योजना श्रद्धेने स्वीकारणे.
३) ‘नाथसंविध्’ असा उच्चार कधी करायचा?
जेव्हा एखादी वाईट किंवा चांगली घटना घडते तेव्हा किंवा आपल्या हातून एखादी वाईट किंवा चांगली कृती घडते तेव्हा आपल्याला ‘नाथसंविध्’ ह्या नामाचे स्मरण केलं पाहिजे.
शुभ कार्याला सुरुवात करताना किंवा शुभकार्य झाल्यावर मला ‘नाथसंविध्’ म्हणायचं आहे.
सकाळी उठल्यावर, रात्री झोपताना किंवा एखाद्या कामाची सुरुवात करताना आपल्याला ‘नाथसंविध्’ महामंत्राचे स्मरण करता आले पाहिजे.
‘नाथसंविध्’ स्मरण आपलं उद्धरण करून देणारं भगवान त्रिविक्रमाचं नाम आहे.
४) मानवाच्या जीवनात ‘नाथसंविध्’ आराखडा कोण बनवतो?
मानवाच्या जीवनात दत्तगुरु, आदिपिता सहजशिव म्हणजे महादुर्गेश्वर आणि आदिमाता जगदंबा दुर्गा हे तीन नाथ मिळून मानवाच्या जीवनात ‘नाथसंविध्’ आराखडा बनवतात.
५) मानवाच्या जीवनात ‘नाथसंविध्’ आराखडा कार्यरत (अॅक्टिवेट) कोण करतं?
भगवंताच्या योजनेचा विनियोग करण्यासाठी जी ताकद पाहिजे, जे सामर्थ्य पाहिजे, जे मार्गदर्शन पाहिजे, जो हस्तक्षेप पाहिजे ते सर्व भगवान त्रिविक्रम करतो.
६) ‘नाथसंविध्’ उच्चारणातून श्रद्धावानांच्या मनात विविध भाव कसे प्रगटतात?
‘नाथसंविध्’ म्हणजे माता जगदंबा किंवा त्रिनाथांच्या योजनेप्रमाणे घटना घडाव्यात म्हणून श्रद्धावान आपल्या मनातील भाव व्यक्त करतो की, ‘माते जे काही व्हायचं आहे ते तुझ्या आराखड्यानुसार होऊ दे.’
श्रद्धावान जेव्हा पूर्ण मनाने ‘नाथसंविध्’ म्हणतो तेव्हा त्याच्या मनात भाव उमटतो, ‘माते जगदंबे, तुझा जो आराखडा आहे त्यानुसारच माझे जीवन घडू दे.’
श्रद्धावान ‘नाथसंविध्, नाथसंविध्’ श्रद्धापूर्वक अंत:करणाने बोलत राहिल्याने भगवान त्रिविक्रम त्याच्या जीवनामध्ये ‘नाथसंविध्’ आणतो, स्थिर करतो.
श्रद्धावानांचे जीवन कितीही असाध्य झालेलं असलं, कितीही प्रॉब्लेमस् असले तरी भगवान त्रिविक्रम आपल्या करूणेतून आपल्या श्रद्धावानाच्या प्रेमापोटी प्रत्येकाच्या जीवनात ‘नाथसंविध्’ स्थिर करतो.
‘नाथसंविध्’ दत्तगुरुंचा आशीर्वाद आहे.
‘नाथसंविध्’ सहजशिवाचे सामर्थ्य आहे.
‘नाथसंविध्’ आईचा आराखडा आहे. आणि
‘नाथसंविध्’ त्रिविक्रमाची श्रद्धावानांसाठी करुणा आहे.
श्रद्धावानांनो, नाथसंविधाचा स्वीकार करुया व जन्मजन्मांतरासाठी निर्भय होऊ या.
।।हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।।
॥ नाथसंविध्।।